नारळी पौर्णिमा
श्रावण महिन्यातील पौर्णिमा मुख्यत: दोन परंपरांसाठी सर्वसामन्य माणसाला खूप परिचित आहे. त्यापैकी एक परंपरा आहे सागर पूजनाची आणि दुसरी आहे राखी बांधण्याची किंवा रक्षा बंधनाची. त्यापैकी सागर पूजनाची प्रथा मुंबई व कोकणची समुद्र किनारपट्टी या भागात पिढ्यानपिढ्या पाळली जात असते. आपल्या संस्कृतीत आपण जसे नद्यांना देवता मानून त्यांची पूजा करतो तसेच समुद्र ही सुद्धा आपण देवता मानली आहे. पण सागरावर वरुण देवतेची सत्ता असल्याने या दिवशी सागर किनाऱ्यालगतचे आयात-निर्यात करणारे व्यापारी समुद्राला नारळ अर्पण करून वरुण देवतेची प्रार्थना करतात कि हे वरुण देवते आम्ही समुद्रमार्गे जो आयात निर्यातीचा व्यापार करतो तो सुरळीतपणे पार पडू दे.
आमचा माल वाहून नेणाऱ्या नौकांचे दळणवळण कोणतीही आपत्ती न येऊ देता निर्विघ्नपणे पार पडू दे. श्रावणी पौर्णिमेनंतर बहुधा समुद्र शांत होत असल्याने त्यानंतरच्या काळात मालाच्या ने आणीला प्रारंभ होत असतो. म्हणूनच हि पूजा व प्रार्थना श्रद्धेने करण्याचा पूर्वापारचा प्रघात आहे. मुंबई व मुंबई लगतच्या प्रदेशात राहणारे मूळ मच्छिमार कोळीही या दिवशी समुद्राची मनोभावे पूजा करतात. कारण या दिवसापासून पावसाळ्यात बंद असलेला त्यांचा दर्यावर्दीपणा पुन्हा पूर्ववत सुरु होतो. आपल्या वैदिक संस्कृतीने आपल्यासाठी जी कुटुंबव्यवस्था व जी समाज व्यवस्था निर्माण केली आहे त्यात नातेसंबधीची अतिशय हळुवार व नाजूक वीर्ण गुंफून ठेवली आहे. परस्पर स्नेहसंबंधामुळे मानवी जीवन उदात्ततेने सदासर्वकाळ बांधलेले राहावे व या बंधनातून प्रेम, जिव्हाळा, आदरभाव, कृतज्ञता आणि कर्तव्यभावनाची जाणीव आपल्या मनात खोल रुजावी, हि त्यामागील विचारसरणी आहे. पती-पत्नी, माता-पिता, गुरु-शिष्य, भाऊ-बहिण अशा प्रेमळ नात्यांमुळे आपले भावजीवन नेहमी समृद्ध राहते.